काँग्रेसची अपप्रचाराची यंत्रणा खुप मोठी आहे. डॉ. आंबेडकरांच्या दिल्लीतील सभेला समजा पाच हजार लोक असले तर इकडे बातमी यायची की डॉ. आंबेडकरांच्या सभेला फ़क्त पाचशे लोक होते. म्हणजेच डॉ. आंबेडकरांना लोकांचे समर्थन नाही. त्याच्या स्टेजवरील समजा एखादी खुर्ची जरी एखाद्या कार्यकर्त्याचा धक्का लागून पडली तरी इकडे बातमी क्यायची की डॉ. आंबेडकरांच्या सभेत राळा, खुर्च्यांची फेकाफेक. तर अशा या काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी खुप काम केले. यापैकीच एक म्हणजे डॉ. आंबेडकर आणि अस्पृश्य हे कांग्रेसला, त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला साथ देत नाहीत कारण ते ब्रिटिश साम्राज्याचे हस्तस्क आहेत. काँग्रेसच्या या खोट्या प्रचारावर अनेक परकीय सुद्धा विश्वास ठेवत असत. कारण त्यांना वास्तविक परिस्थितीची जाण नव्हती.
स्वातंत्र्याच्या लढ्यात अस्पृश्यांच्या असहकाराविषयी काँग्रेसने दिलेले स्पष्टीकरण हे अत्यंत मुर्खपणाचे होते. असे स्पष्टीकरण एखादा मनोभ्रष्ट माणूसच देऊ शकतो आणि ते समाधानकारक आहे असे एखादा मुर्खच स्वीकारु शकतो. हा आरोप खोटा आहे हे सिद्ध करणे मुळीच कठिण नाही. अस्पृश्य हे तथाकथित स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झाले नाहीत याला कारण ते ब्रिटिश साम्राज्याचे हस्तक होते म्हणून नाहीत तर त्यांना अशी भीती वाटत होती की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्यावर सनातनी हिंदूंचे राज्य प्रस्थापित होईल. सनातनी हिंदू त्यांच्यावर प्रभुत्व गाजवतील आणि त्यामुळे अस्पृश्यांचे विकासाचे सर्वच मार्ग बंद होतील. स्वातंत्र्य आणि सुख समृद्धीचे सर्वच मार्ग अवरुद्ध होऊन त्यांच्या वाट्यावर पाणी भरणे आणि लाकडे फोडणे एवढीच कामे येतील.
यासाठी आणखी दूसरे आणि महत्वाचे कारण हे होते की, ज्या कारणास्तव अस्पृश्यांना काँग्रेसशी असहकार करणे भाग पडले ते कारण म्हणजे, त्यांना हिंदू राज्याची प्रजा व्हावयाचे नव्हते. त्यांना हिंदूंच्या नियंत्रणात राहावयाचे नव्हते, ज्या राज्यात राज्यकर्ते ब्राम्हण आणि बनिया असतील आणि त्यापेक्षा कनिष्ठ जातीचे हिंदू पोलीस म्हणून कार्य करतील आणि हेच वंशपरंपरने अस्पृश्यांचे शत्रू होते.
याचाच अर्थ अस्पृश्य ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य प्राप्तीच्या विरोधात नव्हते, पण त्यांचा असा आग्रह होता की, देश ब्रिटिशांपासून स्वतंत्र होणे एवढेच पुरेसे नाही तर स्वतंत्र देश हा लोकशाहीच्या संवर्धनासाठी सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. म्हणून फ़क्त ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाल्याने अस्पृश्यांचे समाधान होणार नव्हते. त्यांचे म्हणणे होते की, देशातील विशिष्ट समाज व्यवस्था लक्षात घेता, या व्यवस्थेत अनेक अल्पसंख्य जातीजमाती असून त्यांच्या विरोधात जातीय बहुसंख्यक असलेले हिंदू आहेत. तेव्हा या बहुसंख्यक हिंदूंच्या अधिकारावर नियंत्रणाची कोणतीही व्यवस्था संविधानात करण्यात आली नाही तर देशात लोकशाही सुरक्षित राहणार नाही. म्हणून अस्पृश्यांचा असा आग्रह होता की, असे संविधान रचण्यात यावे की, ज्यात देशाच्या विशेष परिस्थितीची दखल घेतलेली असेल आणि अशा संरक्षक तरतुदी करण्यात आल्या असतील की, ज्यामुळे जातीय बहुमताला देशातील राजकीय सत्तेच्या एकाधिकारापासून प्रतिबंधित करता येईल. त्यांना अस्पृश्यांना दडपून टाकता येणार नाही. त्यांचे शोषण करता येणार नाही. नविन संविधानात अशी प्रावधाने असतील की, ज्यामुळे अस्पृश्यांना काही राजकीय अधिकार प्राप्त होऊ शकतील. असे अधिकार ज्यांच्या आधारावर अस्पृश्य आपल्या शोषणाचा, दडपशाहीचा विरोध करु शकतील. ही प्रावधाने त्यांना स्वतःच्या सामर्थ्यावर जातीय बहुमताच्या विरोधात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी सहायक ठरतील. थोडक्यात अस्पृश्यांना संविधानात संरक्षक प्रावधाने पाहिजे होती, जी प्रावधाने हिंदू बहुसंख्यांकांच्या जुलुमापासून त्यांचे संरक्षण करु शकतील.
याउलट काँग्रेसचे प्रथम आणि अंतिम ध्येय हे होते की, ब्रिटिश साम्राज्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळावे. देशाचे संविधान कसे असावे असा प्रश्न काँग्रेसला कोणी विचारले तर त्यांचे उत्तर असे की, ते लोकशाही प्रधान असावे. लोकशाही कशी तर ती प्रौढ़ मताधिकारावर आधारित. बहुसंख्य हिंदूंच्या जुलुमाचा प्रतिकार करण्यासाठी संविधानात संरक्षक प्रावधाने ठेवण्यास त्यांचा नकार असे. का? तर अशा प्रावधानामुळे देशाचे तुकड़े पडतील असा त्यांचा अजब तर्क असे. या तर्काची उत्पत्ती मा. गांधी यांच्या सुपिक डोक्यातून झाली. खरे म्हणजे अशा प्रावधानामुळे उच्चवर्णीय हिंदूंच्या हितावर आघात होईल असे त्यांना वाटत होते.
अस्पृश्यांनी हा मुर्ख पण ढोंगी साधुवाद स्वीकारण्यास नकार दिला. त्यांचे म्हणणे असे होते की, जातीय भावना आणि जातीय पूर्वाग्रह हे देशाचे कठोर वास्तव आहे. आणि हे सर्व धर्मावर आधारित असल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट होणारी ही बाब नाही. म्हणूनच सांविधानिक तरतुदी आवश्यक आहेत.
आणि हेच अस्पृश्य काँग्रेसला सहकार्य न करण्याचे कारण होते.
अस्पृश्यांच्या मागण्या कोणत्या होत्या? १. विधानमंडळात किमान निश्चित प्रतिनिधित्वाची हमी २. कार्यकारिणीत किंवा प्रशासनात किमान निश्चित प्रतिनिधित्वाची हमी ३. सार्वजनिक सेवात किमान निश्चित प्रतिनिधित्वाची हमी. या मागण्यांचा काँग्रेसने धिक्कार केला. या मागण्या जातीय भावनेवर आधारित आहेत असा त्यांचा आरोप होता. या मागण्यांच्या आधारावर अस्पृश्यांना स्वार्थी आणि पोटार्थी संबोधिले गेले.
अशाप्रकारची हमी मागण्याचा उद्देश अस्पृश्यांची विधानमंडळे, प्रशासन आणि सार्वजनिक सेवेत सर्वस्तरावर अस्पृश्यांची भरती व्हावी असा मुळीच नव्हता. परंतु या हमीचा उद्देश, बहुसंख्य हिंदुच्या जातीय वरवंटयाखाली अस्पृश्य भरडले जाऊ नयेत म्हणून एक न्यूनतम हमीचे प्रावधान त्यांना हवे होते. त्यांचा उद्देश बहुसंख्य हिंदुच्या जातीयवादावर नियंत्रण ठेवणे हा होता, त्याला मर्यादा घालणे हा होता. अस्पृश्यांना अशी कोणतीही हमी दिली गेली नाही तर बहुसंख्य हिंदू जातीयवादी हे विधानमंडळे, प्रशासन आणि शासनयंत्रणा आपली बटीक बनवतील आणि आणि त्यामुळे राज्याची महत्वाची अंगे अस्पृश्यांना संरक्षण देण्याऐवजी हिंदू बहुसंख्यक जातीयावाद्यांच्या हातचे बाहुले बनून त्यांच्या लहरीनुसार या यंत्रणा कार्य करण्यास बाध्य होतील.
म्हणून संविधानात संरक्षक प्रावधाने घालून या संकटाला आळा घालणे आवश्यक होते. दुस-या शब्दात अस्पृश्य हे देशाची लोकशाही सुरक्षित ठेवण्यास उत्सुक होते, परंतु कांग्रेस मात्र लोकशाहीच्या प्रकट विरोधात नसली तरी खरी लोकशाही अस्तित्वात यावी यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करण्याच्या निश्चितच विरोधात होती.
संविधानात्मक प्रावधानांना विरोध करण्याचा कांग्रेसचा खरा हेतु हा हिंदू व बहुसंख्य समाजाला राजकीय कुरण चरण्यासाठी मुक्तपणे खुले असावे हाच होता. कांग्रेस जातीयवादी असणे स्वाभाविक होते. कारण जातीय बहुसंख्य हिंदू हे कॉंग्रेसचा मुख्य आधार होते. कांग्रेस ही हिंदूचीच बनलेली आहे आणि हिंदूंच्या भरवश्यावरच तीचे अस्तित्व जिवंत आहे. राष्ट्रीयता हे काँग्रेसचे आवरण होते. ज्याखाली जातीयवादी शक्तींना मोकळे रान उपलब्ध व्हावे असा काँग्रेसचा हेतु होता.
एवढे सर्व झाल्यावरही काही जण विचारत होते की, स्वातंत्र्याच्या लढ्यात अस्पृश्य कांग्रेसबरोबर का नव्हते? काँग्रेसशी सहकार्य करण्याची पूर्व अट संविधानात्मक संरक्षक प्रावधाने ही होती. काँग्रेसचे म्हणणे होते की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अशी प्रावधाने केली जाऊ शकतात. परंतु अस्पृश्यांचे कांग्रेससोबत जे मतभेद होते त्या आधारावर कांग्रेससोबत सहकार्य करणे अस्पृश्यांना सुरक्षित वाटत नव्हते. अशाप्रकारचा अग्रिम करार व्हावा यात काँग्रेसचे काय नुकसान होते असा अस्पृश्यांचा प्रश्न होता. काँग्रेसने जर अशी हमी दिली असती तर काँग्रेसचे काय नुकसान होणार होते? अस्पृश्यांचा तर्क असा होता की, काँग्रेसने संरक्षक प्रावधानांना अग्रिम मान्यता दिली तर अस्पृश्य आश्वस्त होतील. आणि काँग्रेसचे हे आश्वासन अस्पृश्यांना सहकार्य करण्यास प्रवृत्त करेल. अस्पृश्य कांग्रेसशी का सहकार्य करीत नव्हते, कारण त्यांना भीती वाटत होती की, जर स्वातंत्र्य प्राप्त झाले तर पुन्हा एकदा बहुसंख्य हिंदुंना अस्पृश्यांना गुलाम करण्याची संधी मिळेल. अस्पृश्यांचा बहुसंख्य हिंदूबद्दलचा आणि जगाचा आजपर्यंतचा अनुभव फारसा चांगला नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर संरक्षक प्रावधाने देण्यात येतील या बोलण्यावर अस्पृश्यांचा विश्वास नव्हता. अति आत्मविश्वासाने आपली सुरक्षा धोक्यास्त आणून आपले अस्तित्व संपवण्यापेक्षा सुरक्षेची तरतुद करुन अस्तित्व टिकविणे अधिक चांगले. यात आपणास कोणी भित्रे म्हटले तरी चालेल, असे अस्पृश्यांना वाटत होते. मग जर ही भीती अग्रिम करार करवुन घालवण्यासारखी होती तर कांग्रेस त्याला का तयार नव्हती?
(संदर्भ - डॉ. बाबासाहेब काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रती काय केले?)