शनिवार, १२ जून, २०२१

गांधीवाद - १

गांधीवादाचे पहिले विशेषण म्हणजे, ज्यांच्याजवळ जे आहे ते त्यांच्याजवळ सुरक्षित आहे यासाठी त्याला मदत करणारा आणि ज्यांच्याजवळ जे नाही ते मिळविण्याचा त्यांचा हक्क प्रस्थापित करण्यापासून त्यांना प्रतिबंधित करणारा हा वाद आहे. गांधीवादी प्रवृत्तीचे कोणीही अध्ययन तर हे स्पष्ट होईल की, गांधीवादाचा जातीव्यवस्थेप्रती दृष्टिकोण आदरार्थी आहे आणि गरीबांच्या हितासाठी श्रीमंतांना विश्वस्त म्हणून संबोधण्याचा धुर्तपणा हेच गांधीवादाचे खरे स्वरूप आहे. 

गांधीवाद हा प्रतिष्ठासंपन्न लोकांचे, ऐषआरामी जीवन जगणारांचे तत्वज्ञान आहे. 

गांधीवादाचे दूसरे विशेष लक्षण हे की, गांधीवाद लोकांना त्याची दुर्दैवी स्थिती हीच त्यांची सुदैवी स्थिती आहे हे सांगतो व त्यांनी ती स्वीकारावी व त्यातच आनंद मानावा यासाठी प्रयत्न करतो. हे विधान सत्य आहे हे पटवून देण्यासाठी एक दोन उदाहरण पुरे होतील. 

हिंदूंचा पवित्र कायदा शूद्रांनी संपत्ती धारण केल्यास त्यांना शिक्षा फार्मावतो. एका विशिष्ट वर्गावर सक्तीने गरीबी लादणारा हा कायदा आहे. गांधीवाद हे निर्बंध रद्द करु इच्छीत नाही. गांधीवाद शूद्रांचे त्यांच्या संपत्ती त्यागण्याच्या नैतिक धैर्याबद्दल, अभिनंदन करतो. श्री. गांधी यांच्याच शब्दात, "शुद्र हे आपले धार्मिक कर्तव्य म्हणून सेवा करतात (उच्च वर्णाची) ते कधीही संपत्ती धारण करणार नाहीत. त्यांच्यात संपत्तीच्या स्वरुपात काहीही धारण करण्याची आकांक्षा सुद्धा नाही. याकरिता त्यांचे हजारदा अभिनंदन केले पाहिजे. देवसुद्धा त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतील." 

भंग्याप्रती गांधीवादाचा जो दृष्टिकोण आहे त्याचे एक उदाहरण पाहूया. हिंदूंचा पवित्र कायदा असे म्हणतो की भंग्याच्या मुलांनी भंग्याचा व्यवसाय करुनच जीवन जगावे. हिंदूव्यवस्थेत भंग्याचा व्यवसाय हा स्वेच्छेने निवडलेला व्यवसाय नाही. तो त्यांच्यावर जबरदस्तीने लादलेला व्यवसाय आहे. याविषयी गांधीवाद काय म्हणतो? गांधीवाद हा भंग्याच्या व्यवसायाला समाजहिताचा उच्च व्यवसाय म्हणतो व त्या व्यवसायाची स्तुती करतो. व तो व्यवसाय त्याच लोकांनी करावा आणि तो व्यवसाय समाजात कायम राहावा असे प्रयत्न करतो. अस्पृश्यांच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून श्री. गांधी म्हणाले, "मला मोक्ष प्राप्त व्हावा अशी माझी आकांक्षा नाही. मला पुनर्जन्मही नको आहे. पण जर मला पुन्हा जन्म घ्यावाच लागला तर अस्पृश्य म्हणून माझा जन्म व्हावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. त्यामुळे मला त्यांच्या दुःखात सहभागी होता येईल. त्यांच्या व्यथा वेदनात सहभागी होता येईल. त्यांच्यावर लादलेली गुलामगिरी माझ्याही वाट्यावर येईल. मी त्यांच्यात जन्म घेतल्याने मला या दुःखद स्थितीतून माझ्याही मुक्तीसाठी व त्यांच्याही मुक्तीसाठी प्रयत्न करता येईल. म्हणून मी प्रार्थना करतो की, मला जर पुन्हा जन्म मिळणारच असेल तर तो जन्म मला ब्राम्हणाच्या, क्षत्रियाच्या, वैश्याच्या किंवा शुद्राच्याही पोटी नसावा तर अतिशूद्राच्या पोटी असावा." 

मला भंगी कामाची आवड आहे. माझ्या आश्रमात १८ वर्षाचा ब्राम्हणाचा मुलगा भंग्याचे काम करतो आहे. हा मुलगा आश्रमात भंग्याला भंगी काम चांगले कसे करावे हे शिकविण्यासाठी ते काम करतो आहे. हा मुलगा काही समाजसुधारक नाही. त्याचा जन्म सनातनी कुटुंबात झाला आहे. तो सनातनी कुटुंबातच लहानाचा मोठा झाला आहे. पण जोपर्यंत तो एक चांगला भंगी होऊ शकत नाही तोपर्यंत त्याचे जीवितकार्य सफल झाले असे त्याला वाटत नाही. म्हणून आश्रमात भंग्याने आपले काम चांगले करावे असे त्याला वाटत असेल तर, प्रथम त्याने ते काम व्यव्यस्थितपणे करावे व आपल्या कृतीने आदर्श प्रस्तुत करावा हेच उत्तम असे त्याला वाटते." 

"भंग्याचे काम करुन तुम्ही हिंदू समाजातील घाण साफ़ करता आहात याची जाणीव ठेवावी.' असा फसवा युक्तिवाद करुन समाजातील विकृती एका समाजाने दुस-या समाजावर जबरदस्तीने लादल्या आहेत. गांधीवाद हा गरीबीचे तत्वज्ञान एका विशिष्ट वर्गासाठी न सांगता सर्वांसाठी सांगत असेल तर एवढेच म्हणता येईल की हे तत्वज्ञान चुकीचे तत्वज्ञान आहे. पण हा वाद एकाच वर्गासाठी गरीबीचे उदात्तीकरण करतो आहे. विवेकबुद्धीच्या अधारावर त्यांच्याप्रती केलेल्या क्रूर भेदभावाचा अस्पृश्यांनी धिक्कार केला असता पण गांधीवाद त्यांना त्यातच अभिमान बाळगण्यासाठी, प्रतिष्ठित व्यवसाय आहे असे मानण्यासाठी प्रवृत्त करु इच्छीतो याचे कारण काय? ब्राम्हणही भंग्याचे काम करावयास तयार आहे हे भंग्याला सांगण्याची काय आवश्यकता आहे. कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार ब्राम्हणाने जरी भंग्याचे काम केले तरी, जन्मजात भंग्यावर हा समाज जे निर्बंध लादतो, ज्या विकृती त्याला सहन कराव्या लागतात त्या ब्राम्हण भंग्याच्या वाटेवर कधीही येणार नाहीत. कारण हिंदुस्थानात भंगी भंग्याचे काम करतो म्हणून तो भंगी नाही. भंगी हा भंग्याचे काम करीत असो अथवा नसो, तो भंगी समाजात जन्माला आला म्हणून तो भंगी आहे. जे भंगीकाम करु इच्छीत नाही त्यांनीही भंगी काम करावे म्हणून गांधीवाद हा भंगीकाम हे पवित्र व्यवसाय आहे, अशी शिकवण देत असेल तर त्या उपदेशाची उपयोगिता समजूनही घेता येईल. मग फ़क्त भंग्याच्या आत्मसन्माणाला आणि प्रतिष्ठेला आवाहन करुन त्यांनी आपले भंग्याचे काम अबाधितपणे सुरु ठेवावे यासाठीच सारे प्रयत्न करण्याची गरज काय? 

भंग्याचे काम हे उदात्त काम आहे हे त्याला सांगण्याच्या पाठीमागे हेतू हा असावा की त्याला ते काम करताना त्याची लाज वाटू नये. गरीबी ही शूद्रांकरीता चांगली हे फ़क्त त्यानाच शिकविणे आणि इतरांना नाही. भंगी काम हे अस्पृश्यांनाच योग्य आहे आणि इतरांना नाही हे त्यानाच शिकविणे, त्यांच्यावर जबरदस्तीने लादण्यात आलेले हे व्यवसाय त्यांनी स्वेच्छेने स्वीकारावे म्हणून त्यांना सतत शिकवण देणे, त्यासाठी त्यांच्या भावनांना आवाहन करणे ही त्यांच्याप्रती गांधी आणि गांधीवादाने केलेली क्रूर थट्टाच होय. या असहय्य वर्गाप्रती अशाप्रकारचे घृणीत कार्य श्री. गांधीच शांतचित्ताने व कोणत्याही प्रकारची खंत न बाळगता करु शकतात. 

ज्यांच्याप्रती अन्याय होतो आहे, त्या अन्यायाच्या बळीलाही अन्याय ही तुझी सुविधा आहे हे सांगणे हेच गांधीवादाचे तंत्र आहे. जर कोणत्याही वादाने धर्माचा उपयोग अफुच्या गोळीसारखा केला असेल, लोकांना भ्रमित करण्यास प्रवृत्त केले असेल, चुकीचा विश्वास आणि सुरक्षा प्रदान करण्याकरिता केला असेल तर तो वाद म्हणजे गांधीवाद होय. 
संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, 
काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रती काय केले?

अहिंसा

मी सुद्धा स्वतः अहिंसा तत्वाला शिरोधार्य मानणारा माणूस आहे. परंतु अहिंसा आणि लीनता यामध्ये मी फरक करतो. लीनता म्हणजे दुर्बलता आणि स्वतःच स्वतःवर दुर्बलता लादून घेणे हा काही सद्गुण नव्हे. एका उपनिषदामध्ये एका कोकराची एक गोष्ट आहे. ते देवाजवळ गेले आणि त्याने तक्रार केली की, "देवा, तू सर्व प्राणिमात्रांचा बाप असल्यामुळे सर्व प्राणी भाऊ-भाऊ आहेत परंतु असे असले तरी प्रत्येक प्राणी हे सर्व बंधुप्रेम विसरून जाऊन मला खाऊ की गिळू असे करीत आहेत. हे असे काय म्हणून?" कोकराने देवाला विचारले. देवाच्या तोंडी घातलेले उत्तर मोठे विचार करण्यासारखे आहे. देव म्हणाला, "तू इतका लीन व लुसलुशित दिसतोस की तुला खाऊन टाकावे असा मलासुद्धा मोह होत आहे." या गोष्टीतील कोकराप्रमाणेच् आपली बरीचशी स्थिती आजपर्यन्त होती आणि म्हणूनच प्रत्येकजण आपणाला खाऊ की गिळू असा धाक घालित होता. मी अहिंसेवर श्रद्धा ठेवणारा आहेच पण - 

'दया तिचे नाव भूतांचे पाळण । 
आणिक निर्दाळण कंटकांचे ।।' 

या तुकाराम महाराजांच्या अहिंसेच्या व्याख्येतील अर्थाने. तुकारामाने अत्यंत समर्पकपणे दोन गोष्टींमध्ये अहिंसा असल्याचे सांगितले आहे. एक सर्व प्राणीमात्रासंबंधी प्रेम व दया आणि दोन दृष्ट लोकांचा नाश. अहिंसेच्या व्याख्येतील या दुस-या भागाकडे बहुधा दुर्लक्ष होते व या नजरचुकीमुळेच अहिंसेचे तत्व हास्यास्पद होते. दृष्टांचा विनाश करणे हा अहिंसा तत्वातील महत्वाचा घटक आहे. त्याच्याशिवाय अहिंसा म्हणजे केवळ टरफल, फ़क्त कल्पनारम्य सुख. व्यवहारात वापरण्याजोगे तत्व म्हणून ते उरतच नाही. जोपर्यंत दुस-याला दुःख देण्याची दृष्ट इच्छा आपण बाळगीत नाही आणि जोपर्यंत केवळ सर्व दृष्टांचा नाश करण्याच्या सिमेपर्यंतच आपण मर्यादा घालून घेऊ तोपर्यंत शक्तीची उपासना करण्याविरुद्ध व शक्ति संघटनेविरुद्ध कोणीही कोल्हेकुई करू शकत नाही. शिलाने नियंत्रित केलेली शक्ति आमचा आदर्श आहे. अविचाराने कोणालाही दुःख देण्याचे टाळा. संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग २,

सिद्धार्थाने गृहत्याग का केला?

सिद्धार्थ गौतमाने परिव्रज्या का ग्रहण केली? 

सिद्धार्थ गौतमाने परिव्रज्या का ग्रहण केली किंवा गृहत्याग का केला ह्याचे पारंपारिक कारण असे देण्यात येते की त्यांनी एके दिवशी एक वृद्ध व्यक्ति, एक रुग्ण आणि एक मृत देह बघीतला. सिद्धार्थाला हे बघून अतिशय वाईट वाटले, सांसारिक जीवन निरर्थक वाटले म्हणून त्याने परिव्रज्या ग्रहण केली. खरं म्हणजे हे कारण अतिशय हास्यास्पद वाटते. ह्या शेकड्याने घडणा-या घटना आहेत. सिद्धार्थ गौतमाने वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी परिव्रज्या ग्रहण केली. वरील तिन दृश्य बघितली म्हणून जर त्याने परिव्रज्या ग्रहण केली असेल तर ही तिन दृश्ये त्यापूर्वी त्याला कधी कशी दिसली नाहीत. ह्या शेकड्याने घडणा-या घटना त्यापूर्वी सिद्धार्थाच्या नजरेस न येणे असंभाव्य वाटते. 

मग परिव्रज्या ग्रहण करण्याचे कारण काय? 

डॉ. बाबासाहेबांना आंबेडकरांनी आपल्या 'बुद्ध आणि त्याचा धम्म' या ग्रंथात याचे कारण दिलेले आहे. शाक्यांचा एक संघ होता. वयाची विस वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणास संघाची दीक्षा घेऊन संघाचे सभासद व्हावे लागत असे. नियमाप्रमाणे सिद्धार्थाच्या वयाला विस वर्षे पूर्ण झाल्यावर त्याला शाक्य संघाचा सभासद व्हावे लागले. संघाचा सभासद झालेल्या प्रत्येक व्यक्तिस तो कोणीही असला तरी संघाचे नियम, अटी पाळाव्या लागत होत्या. त्यात काही कसूर झाल्यास संघ जी शिक्षा देईल ती त्याला मान्य करावी लागत असे. 

संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी एक घटना घडली. शाक्यांच्या सिमेला लागून कोलियांचे राज्य होते. या दोन राज्यांच्या मधून रोहिणी नदी वाहत होती. या नदीचे पाणी प्रथम कोणी घ्यावे म्हणून शाक्य आणि कोलिय या दोन राज्यात वाद झाला. त्यावेळी झालेल्या संघर्षात दोन्ही राज्यातील लोकांना दुखापती झाल्या. शाक्य आणि कोलिय यांच्यात युद्ध करुन हा प्रश्न कायमचा मिटवावा असे ठरले. 

त्याप्रमाणे शाक्य संघाच्या सभापतीने युद्धाचा ठराव मांडला. परंतु सिद्धार्थाने युद्धाला विरोध केला. त्याच्या मते दोन्ही बाजूंच्या काही लोकांनी एकत्र येऊन हा प्रश्न सामोपचाराने सोडवावा. 

परंतु युद्धाच्या बाजूने सभासदांचे बहुमत होते. युद्धासाठी सैन्याची उभारणी करीत असतांना सिद्धार्थाने सैन्यात दाखल होण्यास नकार दिला. संघाच्या नियमाप्रमाणे संघाचे आदेश न पाळणा-यास संघ शिक्षा देऊ शकत होता. सिद्धार्थापुढे तिन पर्याय होते. एक सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे; दुसरा देहान्तशासन किंवा देशत्यागास संमती देणे; आणि तीसरा आपल्या कुटुंबीयांवर सामाजिक बहीष्कार ओढवून घेऊन कुटुंबाची जमीन आणि मालमत्ता जप्ती होऊन उपजीविकेचे साधन हिरावुन घेऊन उपासमारीस तयार होणे. 

सिद्धार्थाचा पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल निर्धार होता. तिस-या पर्यायामुळे त्याच्या अपराधामुळे कुटुंबीयांना त्रास झाला असता. त्यामुळे त्याने देहान्तशासन किंवा देशत्याग हा दूसरा पर्याय निवडला. 

संघाचा सेनापती सिद्धार्थास म्हणाला की तू देहान्ताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास तयार झालास तरी कोशल राजास ही गोष्ट समजल्यास तो संघास जाब विचारील. त्यावर सिद्धार्थ म्हणाला की मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. त्याप्रमाणे सिद्धार्थाने आपल्या आई-वडिलांची आणि पत्नीची संमती मिळवूनच शेवटी देशत्याग (गृहत्याग) केला.

भारतातील सवर्णांची आरक्षणाबाबत निति सकारात्मक नाही

अमेरिकेत ब्लॅक्स लोकांना जे आरक्षण आहे त्याला तिथे Affermative Policy (सकारात्मक नीती) म्हटले जाते. आज अमेरिकेतील ब्लॅक्स शासन, प्रशासन, मीडिया, उद्योगधंदे, हॉलीवुड सर्व क्षेत्रात पुढे आहे. अमेरिकेतील गो-या लोकांनी प्रत्येक क्षेत्रात ब्लॅक्स लोकांना प्रत्येक गोष्ट शिकण्याची व त्यात सुधारणा करुन यशस्वी होण्याची संधी दिली. कारण अमेरिकेतील गो-या लोकांची ब्लॅक्स लोकंबाबतची नीति सकारात्मक होती. 

मात्र भारतात अनुसूचित जाती, जमातीच्या आरक्षणाबाबत सवर्णांची निति ही नकारात्मक आहे. त्यामुळे शासन प्रशासनातील प्रत्येक अधिका-याने वेगवेगळे डावपेच आखुन आरक्षणात अडथळे आणले. आणि दुसरीकडे शेकडो वर्ष ज्यांनी बिनदिक्कत मनुस्मृतीच्या कायद्यानुसार १००% आरक्षण घेतले तेच लोक ७० वर्षापासून आरक्षण म्हणून बोंबा मारत आहेत. 

शेवटी जे लोक देश स्वतंत्र झाला नाही तरी चालेल परंतु अनुसूचित जाती, जमातीला शासन, प्रशासनात कोणतेही विशेष अधिकार मिळू नये यासाठी प्रयत्न करीत होते त्यांच्याकडून अमेरिकेतील गो-यांसारखी सकारात्मकतेची अपेक्षाच करता येत नाही.

काँग्रेसच्या काळात अंधश्रद्धा नव्हती हे म्हणणं चुकीचं

आपल्याला असे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे की भाजप, आर एस एस च्या सत्तेच्या काळातच मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक कर्मकांड यामध्ये वाढ झालेली आहे. मुख्यता हा काँग्रेससारख्या कोणत्याही एका पक्षाचा दोष नाही. दोष आहे पुरातन अवैज्ञानिक ब्राम्हणी मानसिकतेचा. त्यामुळे फ़क्त भाजपला धारेवर धरून काँग्रेसला सूट देण्यात अर्थ नाही. ब्राम्हणी मानसिकतेचे प्राबल्य जिथे असेल तिथे हा दोष आढळणारच. फ़क्त प्रमाण कमी जास्त होऊ शकते. कुठे लपून तर कुठे उघड़ पद्धतीने हे केले जाते. 

जवाहरलाल नेहरू हे आधुनिक विचारसरणीचे होते असा एक भ्रम पसरविण्यात आलेला आहे. परंतु माझा तर्क आहे की नेहरू कधीही आधुनिक विचारसरणीचे प्रतिनिधित्व करीत नव्हते. त्यांची जीवन शैली आधुनिक होती आणि त्यांचे शिक्षण सुद्धा आधुनिक पद्धतीने झाले होते. परंतु त्यांनी देशाची राजकीय सत्ता हातात घेतल्यानंतर त्यांनी भारताला परंपरा आणि पारंपरिक मुल्ये यापासून कधीही मुक्त करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी आय आय टी, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ सायन्स सारख्या संस्था स्थापन केल्या परंतु समाज जीवनातील पुरातन मूल्य यावर कधीही प्रहार केला नाही. भारताला मिळालेलं स्वातंत्र्य ही अशी संधी होती जिथुन देश आधुनिकतेच्या प्रवासाला सुरुवात करुन यूरोप प्रमाणे वैज्ञानिक क्रांति आणि औद्योगिक क्रांतीचे लाभ प्राप्त करु शकत होता. परंतु नेहरुने ती संधी वाया घालवली. 

देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आले त्यावरून आपण कुठल्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली ते बघण्यासारखे होते. लैरी कोलिन्स आणि डोमनिक लैपियर यांनी आपल्या 'फ्रीडम एट मिडनाईट' या आपल्या पुस्तकात त्याचे वर्णन केले आहे. स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी १४/१५ ऑगष्ट १९४७ ला दोन दक्षिण भारतीय ब्राम्हणांनी स्वातंत्र्य समारोहात जाण्यासाठी नेहरूंना मोठ्या प्रमाणात सजविले. दोघांनी जवाहरलाल नेहरूंवर पवित्र जल शिंपडले, कपाळाला भभूत लावण्यात आले, एक दंड त्यांच्या हातात देण्यात आला आणि पवित्र वस्त्र परिधान करण्यात आले. नेहरूंनी हे सर्व प्रसन्नतेने होऊ दिले. हा असा प्रकार होता जसे सामोर जे भव्य कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी तांत्रिक व्यक्तीची मदत जरी घेण्याची गरज पडली तरी त्याकडे दुर्लक्ष करु नये. 

घरी हा समारोह पार पडल्यानंतर नेहरू १४/१५ ऑगष्टच्या मध्यरात्री स्वतंत्रता समारोहात गेले तेव्हा त्यांच्या शरीरावरून हे सर्व बाजुला झाले होते. आता त्यांच्या शरीरावर त्यांचा नेहमीचा नेहरू कोट आणि चुस्त पायजमा होता आणि कोटावर ताजे गुलाबाचं फूल होतं. यावरून नेहरू एकाचवेळी दोन परस्परविरोधी भूमिका पार पाडत होते हे त्यांच्या वेशभूषेवरून दिसून येते. 

तिथुनच काही दूर संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या सरकारी निवासस्थानी लॉनवर रात्री हवन करण्यात आले, जिथे ब्राम्हणांनी मंत्रोच्चार केला. कोलिन्स आणि लेपियर म्हणतात, "पुरोहित जोर जोरात मंत्र म्हणत होते आणि जे लोक स्वतंत्र भारताचे मंत्री बनणार होते ते हवन कुंडाच्या बाजुला उभे होते. आणि एक ब्राम्हण पवित्र जल त्यांच्यावर शिंपडत होता." 

तिथुनच हे सर्व लोक त्या हॉलमध्ये गेले जिथे काही वेळातच देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा होणार होती. फ्रीडम एट मिडनाईट च्या लेखकांनी सविस्तर सांगितले की, जेव्हा भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबटन यांनी स्वातंत्र्याची तारीख ही १५ ऑगष्ट आहे हे घोषित केले त्यावेळेस देशभरातील ज्योतिष्यानी आकांडतांडव केले. काल आणि पंचांगाची गणना सुरु झाली आणि ज्योतिष्यानी घोषित केले की हा दिवस अशुभ आहे आणि या दिवशी स्वातंत्र्य मिळाले तर देशावर मोठे संकट येईल. शनि, राहु आणि आणखी कोणकोणत्या ग्रहांची दशा कशी आहे याच्या आधारे ज्योतिष्यानी माऊंटबटनला पत्र सुद्धा लिहिले. 

त्यावेळी भारतातील शिकागो डेली चे पत्रकार आपल्या मित्राला पाठविलेल्या पत्रात म्हणतात की, "ज्या देशाचा जन्मच मुहर्त पाहून झाला त्या देशातील नागरिक आपल्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोण अंमलात आणतील ही अपेक्षाच चुकीची आहे." 

त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर प्रत्येक सरकारी कार्यक्रमात अवैज्ञानिक कर्मकांडाचे पालन होतांना दिसून आले. 

- जेव्हा इसरो एखादे सैटेलाइट अवकाशात सोडते तेव्हा प्रथम इसरो प्रमुख तिरुपती बालाजी मंदिरात पुजापाठ करतात. 
- ज्यावेळेस देशासाठी युद्ध विमान खरेदी करण्यात येतात तेव्हा वायुसेनेत समावेश करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. 
- नौसेनेमध्ये एखादे जहाज सामील करण्यापूर्वी नारळ फोड़ण्याची प्रथा आहे. 
- सरकारी समारोह नेहमी देवी देवतेच्या वंदनेने आणि पूजने सुरु होतो. 

ही यादी फार लांब होऊ शकते. हे सर्व चूक आहे की बरोबर आहे याबद्दल मी काहीच म्हणत नाही. माझं म्हणणं हे आहे की हे सर्व भाजप सत्तेत येण्यापूर्वीपासून सुरु आहे. काँग्रेस, भाजप, डावे कोण सत्तेत आहे यापेक्षा कोणता वर्ग सत्तेत आहे हे बघणे महत्वाचे आहे. काँग्रेस, भाजप, डावे, आप हे सर्व ब्राम्हणी मानसिकतेचे पक्ष आहेत.

मा. गांधींचे तर्क

खरं सांगतो, महात्मा गांधींचे खालील तर्क वा भूमिका वाचून एखाद्याची तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते.

तर काळ तो आहे जेव्हा अस्पृश्यांच्या संघटना आपल्या बंधवांवर होणा-या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी स्वतंत्रपणे काम करत होत्या. ते आपल्या नागरिक आणि सामाजिक अधिकारासाठी सवर्ण हिंदूंच्या विरुद्ध सविनय असहकार आंदोलन करीत होते. अस्पृश्यांनी महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्यातून पाणी पिण्यासाठी आणि नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेशासाठी सवर्ण हिंदूंच्या विरुद्ध सत्याग्रह आंदोलन केले होते. त्यावेळी मा. गांधींचे वागणे अतिशय विसंगत होते. 

सुरवातीला सवर्ण हिंदूंच्या विरुद्ध केलेल्या अस्पृश्यांच्या या सत्याग्रहाला समर्थन न करता अस्पृश्यांनी केलेल्या या सत्याग्रहाची मा. गांधींनी निंदा केली. या सत्याग्रहात अस्पृश्यांची भूमिका अतिशय तर्कसंगत होती. अस्पृश्यांचे म्हणणे होते की गांधींच्या म्हणण्यानुसार सवर्ण हिंदू जेव्हा स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी ब्रिटिशांच्या विरुद्ध सविनय असहकार आंदोलन करु शकतात तर अस्पृश्य सवर्ण हिंदूंच्या गुलामीतुन मुक्त होण्यासाठी सवर्ण हिंदूंच्या विरुद्ध सविनय असहकार आंदोलन का करु शकत नाही. हा अतिशय योग्य तर्क होता. परंतु गांधीवर त्याचा काहीही प्रभाव पडला नाही. त्यांनी आपल्या पद्धतीने या तर्काला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. गांधींचं म्हणणं असे होते की अस्पृश्यता हे हिंदुंचं पाप आहे. म्हणून त्याचे प्रायश्चित्य हिंदूंनीच करायला पाहीजे. सवर्ण हिंदूंनीच अस्पृश्यता दूर करण्यासाठी सत्याग्रह करावयास पाहीजे. अस्पृश्यता दूर करण्यासाठी सत्याग्रह करणे हे अस्पृश्यांचे कार्य नाही, कारण ते पापी नाहीत. हा अतिशय बेतुका तर्क होता. याला तर्क म्हणता येणार नाही. याला फार तर वाक्छल म्हणता येईल. परंतु हे स्पष्ट होतं की हा अतिशय बकवास तर्क होता. अस्पृश्यांचं त्यावर उत्तर होतं की, जर गांधींचा हाच दृष्टिकोण आहे की जे पापी असतील त्यांनीच प्रायश्चित्य घेण्यासाठी सत्याग्रह करावा, तर ते हिंदुंना ब्रिटिशांच्या विरुद्ध सत्याग्रह करण्यासाठी का सांगतात. ब्रिटिश साम्राज्यवाद तर ब्रिटिशांचं पाप आहे. मग गांधींच्या तर्कानुसार तर ब्रिटिशांनी सत्याग्रह करावयास पाहीजे. सवर्ण हिंदूंना ब्रिटिशांच्या विरुद्ध सत्याग्रह करण्याची काहीही गरज नाही. अशाप्रकारे अस्पृश्यांनी गांधीजींचा तर्क उडवून लावला. यावरून हे स्पष्ट झालं होतं की सवर्ण हिंदूंच्या विरुद्ध अस्पृश्यांच्या सत्याग्रहाच्या बाबतीत गांधींचा दृष्टिकोण योग्य नव्हता. परंतु गांधी शेवटपर्यंत आपल्या त्याच तर्कावर अडून राहिले. अस्पृश्यांनी कितीही प्रयत्न करुन गांधींनी आपला हट्टीपणा सोडला नाही. 

मा. गांधींच्या दृष्टिकोनात आणखी एक विसंगती होती. दोन ठिकाणी एकसारखेच सत्याग्रह झालेत. पण या दोन ठिकाणी गांधींची भूमिका वेगवेगळी होती. सवर्ण हिंदूंच्या विरुद्ध अस्पृश्यांनी महाड आणि नाशिक येथे सत्याग्रह केला. तसाच सत्याग्रह त्यांनी वाइकोम या गावात सुद्धा केला. गांधींनी वरील तर्क न देता वाइकोम येथील सत्याग्रहाचं समर्थन केलं. एवढंच नाही तर त्यांनी या सत्याग्रहाला आशीर्वाद आणि प्रोत्साहन दिले. तर मग गांधीनी महाड आणि नाशिक येथील सत्याग्रहाला विरोध का केला? काय या दोन सत्याग्रहात असमानता होती? असमानता हीच होती की वाइकोम येथील सत्याग्रह काँग्रेसच्या झेंड्याखाली होता. महाड आणि नाशिक येथील सत्याग्रह अस्पृश्यांनी स्वतंत्ररित्या केले होते. काय गांधींचा विरोध फ़क्त यासाठीच होता? गांधीनी शेवटपर्यंत त्याचे उत्तर दिले नाही. संभवतः गांधी त्या असहाय अस्पृश्यांचे रक्षक नव्हते जे त्यांना आपले रक्षक स्विकारत नव्हते. यावरून हा निष्कर्ष निघतो की, अस्पृश्यांचे स्वतंत्र आंदोलन असेल तर काँग्रेस स्वतःहून त्याला सहकार्य करणार नाही. वास्तविकता ही आहे की काँग्रेसी हिंदू आणि सनातनी हिंदू एकच आहेत. ते निसंकोच होऊन अस्पृश्यांचे डोके फोड़तात. गांधींची ही भूमिका विकृत नसेल तरी अतिशय विसंगत होती. एवढेच नाही तर गांधीनी मुस्लिम,सिख, ईसाई, पारसी, यहूदी लोकांना सांगितले की अस्पृश्यांना कोणीही मदत करु नये. इतर धर्मीय हिंदूना मदत करु शकतात. हिंदू सुद्धा इतर धर्मियांना मदत करु शकतात. फ़क्त अस्पृश्यांना कोणीही मदत करु नये. ईथे सुद्धा त्यांचा हा तर्क जगावेगळा होता. गांधींच्या मित्रांनी अस्पृश्यांप्रति त्यांची कठोरता कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटपर्यंत गांधींनी कुणाचही ऐकलं नाही. गांधीनी अस्पृश्यांचा दृष्टिकोण काय आहे याची मुळीच पर्वा केली नाही. त्यांनी हा विचार नाही केला की सवर्ण हिंदूंसाठी जे पाप आहे तीच बाब अस्पृश्यांसाठी गुलामगिरी आहे.

जातीयवाद्यांनी मनुस्मृती वाचण्याची काहीच गरज नाही

तुम्हालाही असे जातीयवादी लोक कधी ना कधी, कुठे ना कुठे भेटले असतीलच जे जातीयवाद करतात परंतु साधुत्वाचा आव आणून, तुमच्यापेक्षा वयाने किंवा पदाने मोठे असतील तर पाठीवर अगदी प्रेमाने हात ठेवून तुम्हाला म्हणतात, 'अरे भाऊ, आम्ही आतापर्यंत मनुस्मृती कधी वाचली सुद्धा नाही. मनुस्मृती कशी आहे, त्यात काय आहे आम्हाला माहीत सुद्धा नाही. आमच्यापेक्षा तुम्हीच मनुस्मृती जास्त वाचली आहे. तुम्ही लोकच नेहमी मनुस्मृती मनुस्मृती ओरडत असता.'

परंतु अशा तर्काला देता येईल असे उत्तर डॉ. आंबेडकरांनी आधीच देऊन ठेवले आहे. उत्तर बरच मोठं आहे. परंतु त्याचा सारांश पुढील प्रमाणे आहे. त्यांचं म्हणणं होतं की, 'भलेही आज कुठल्या न्यायालयात मनुस्मृतीच्या कायद्याचा वापर केला जात नसेल, कायदा म्हणून मान्यता नसेल परंतु प्रथेच्या रुपात मनुस्मृती आजही अस्तित्वात आहे. मनूची धर्म व्यवस्था हिंदूंच्या प्रथा आणि परंपरांचा अनिवार्य अंग बनलेली आहे. ती हिंदूंच्या रक्तात समावल्या गेलेली आहे. भलेही ती प्रथा असेल परंतु आजही तिचे महत्त्व कमी झालेले नाही. पिढ्यानपिढ्या ती हिंदूंच्या चारित्र्यावर प्रभाव टाकत असून त्यांच्या दृष्टीकोणाची दिशा निर्धारित करीत आहे. पंडित आई-वडिलांना आणि आई-वडील आपल्या मुलांना याचा उपदेश करीत असतील तर मनुस्मृती कशी संपणार? मनुस्मृतीच्या मुळाना रोज पाणी घातले जात आहे आणि प्रत्येकाला ही आठवण करुन दिली जात आहे की अस्पृश्यता हा त्यांच्या धर्माचा भाग आहे. मनुच्या धर्माची ही विषारी लागण पुरुष असो वा स्त्री, लहान मूल असो वा वृद्ध प्रत्येकाच्या मनाला झालेली आहे. एवढेच नाही तर न्यायाधीशांच्या मनाला सुद्धा याची लागण झालेली आहे.'

याचा अर्थ असा होतो की आज जातीयवाद करण्यासाठी मनुस्मृती वाचलीच पाहीजे याची काहीही गरज नाही. शेकडो वर्षापासून चालत आलेल्या प्रथा, परंपरा या माध्यमातून अनेक गोष्टींची शिकवण मिळत असते. प्रत्येक प्रथा, परंपरा कशी पाळायची यासाठी प्रथम धर्मग्रंथ वाचलाच पाहीजे याची काही गरज पडत नाही.

एखादा पुल पडला की, 'आरक्षण वाले इंजीनियर पुल बनवतील तर असेच होणार' असे म्हणणारे तुम्हाला कित्येक भेटले असतील. ही कुठली वृत्ती आहे? यातच जातीयवाद सामावलेला आहे. मनुस्मृती वाचणाराच असे बोलतो असे नाही. असे बोलण्यासाठी मनुस्मृती वाचण्याची गरज त्यांना कधीच पडली नाही. आजपर्यंत जेवढे पुल पडलेत त्यापैकी किती पुलाच्या बांधकामाचं कॉन्ट्रैक्ट आरक्षण वाल्यांना मिळालयं? ह्या पुलांपैकी किती पुलाच्या बांधकामाचे डिझाईनर, इंजीनियर, मटेरियल सप्लायर आरक्षण वाले होते?

परंतु जातीयवाद करणा-याला हे प्रश्न पडत नाही. कारण लहानपणापासून ते ज्या वातावरणात वाढतात त्या वातावरणातून, घरातून, नातेवाईक, मित्रांकडून, सभा-संमेलनातून जे संस्कार मिळतात तशी वृत्ती घडत जाते. प्रथा, परंपरेच्या माध्यमातून हेच संस्कार मिळत असेल तर मनुस्मृती वाचली काय किंवा नाही वाचली काय, काय फरक पडतो?