'काँग्रेस आणि गांधीनी अस्पृश्यांप्रति काय केले?' हा ग्रंथ डॉ. आंबेडकरांनी अतिशय कष्ट घेऊन, आपली महत्वाची कामे बाजुला सारुन लिहिला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि गांधींचे खरे स्वरूप जाणून घेण्यासाठी, ज्यांना राजकारणाची आवड आहे अशा प्रत्येकाने हा ग्रंथ वाचावयास हवा.
यासोबतच अनुसूचित जाती, जमातीच्या प्रत्येकांनी ज्यांना त्यांच्या दुर्दशेचं खरं कारण जाणून घ्यायचं आहे त्यांनी तर हा ग्रंथ प्राधान्य क्रमाने वेळात वेळ काढून वाचावयास हवा.
या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. आंबेडकर म्हणतात, "अस्पृश्यांची स्थिती सुधारण्याच्या हेतूने, त्यांना वास्तवाची जाणीव व्हावी म्हणून आणि वस्तुस्थितीची चुकीची मांडणी करुन विदेशी जनमानसाला भ्रमित करण्याचा काँग्रेसच्या अश्लाघ्य प्रयत्नापाठीमागील काँग्रेसचे खरे स्वरूप उघड़ व्हावे म्हणून श्री. गांधी अणि काँग्रेसच्या या सर्व प्रयत्नाना अधिक विस्ताराने प्रगट करणे आवश्यक आहे. या पुस्तकात श्री. गांधी आणि काँग्रेसच्या कृत्यांचा १९१७ पासून तर आज तारखेचपर्यंतचा आलेखच प्रस्तुत करण्यात आला आहे. अशाप्रकारचे हे पहिलेच अध्ययन आहे. श्री. गांधी यांच्या अंधभक्त हिंदूना हे आवडणार नाहीच पण कदाचित हे अध्ययन त्यांच्या रोषालाही कारणीभूत ठरू शकेल. जेव्हा या पुस्तकाचा निष्कर्ष "श्री. गांधीपासून सावधान" असाच निघतो तेव्हा त्यांच्यापासून यापेक्षा वेगळ्या प्रतिक्रियेची अपेक्षाच असू शकत नाही. हिंदू या पुस्तकाचा अस्वीकार करतील आणि मला दूषणेही देतील. परंतु "कुत्री भूंकत असली तरीही काफिला चालतच राहिला पाहिजे." या म्हणीप्रमाणे मला माझे कर्तव्य केलेच पाहिजे. जो सत्य आणि स्वातंत्र्यावर प्रेम करतो, कशाचीही अपेक्षा करीत नाही, कोणालाही भीत नाही, काहीही मागत नाही, त्याने अशा क्षुल्लक बाबींमुळे निरुत्साही होऊ नये व आपले इतिहास निर्मितीच्या आणि इतिहास लेखनाच्या कार्यावर मर्यादा घालून घेऊ नये."
पुढे डॉ. आंबेडकर म्हणतात, "हे पुस्तक अस्पृश्यांच्या राजकीय हक्काच्या लढ्याची संपूर्ण माहिती देणारा ग्रंथ व्हावा असा माझा हेतू असल्याने सांख्यकीय माहितीशिवाय या पुस्तकात इतर संदर्भात माहिती देणारे परिशिष्टही जोडले आहे. या लढ्याशी संबंधित माहिती देणा-या अनेक शासकीय व अशासकीय प्रलेखांचा समावेश आहे. सर्वसामान्य वाचकांना जी माहिती सहज उपलब्ध होऊ शकते ती अस्पृश्य समाजाला तेवढया सहजतेने उपलब्ध होईलच याची खात्री नाही. म्हणून हे पुस्तक लिहिताना सामान्य वाचकांच्या अभिरुचीला नव्हेतर अस्पृश्यांच्या आवश्यकतेला अधिक प्राधान्य दिले गेले आहे."
डॉ. आंबेडकरांचे म्हणणे होते की, "काँग्रेस आणि गांधी कोणाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत हा प्रश्न त्यांना विचारणे आवश्यक आहे. कारण देश गुलामच राहिला तरी चालेल पण पददलित वर्गाला मात्र सवर्ण हिंदू किंवा ब्राम्हणांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ द्यावयाचे नाही ही काँग्रेस आणि गांधीची नीती होती. पददलितांना मुक्ती हवीच असेल तर त्यांनी खुशाल धर्मांतर करावे, पण हिंदू धर्मात राहावयाचे असेल तर मात्र त्यांना सवर्ण हिंदूंचे गुलाम म्हणूनच राहावे लागेल, हेच काँग्रेस आणि गांधी यांचे धोरण होते."
मुळात हा ग्रंथ अनुसूचित जाती, जमातीचे खरे हितशत्रू कोण आहेत हे त्यांना कळावे म्हणूनच हा ग्रंथ लिहिण्याचे कष्ट डॉ. आंबेडकरांनी घेतले आहेत. हा ग्रंथ वाचल्यानंतर जे सध्याचं राजकारण बघताहेत त्यांना पुरेपूर आणि पक्की खात्री पटेल की, काँग्रेस आणि भाजप (आर एस एस) या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत किंवा एकाच शरीराचे दोन हात आहेत. एक नागनाथ तर एक सापनाथ आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.