दिनांक २५ डिसेंबर १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भाषाणातील काही अंश
आज या ठिकाणी या छोट्याश्या मंदिरात भगवान बुद्धाच्या मुर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे एखादे मंदिर बांधण्यात आले तर त्यात भैरोबा, खंडोबा, मरीआई वगैरे नानाप्रकारच्या देवता ठेवल्या जातात. आपले लोक भाविक असल्यामुळे ते विष्णु, शिव अशात-हेच्या देवतांची स्थापना करतात. येथे आज हा नवीन देव आणून स्थापला आहे. आपल्यापैकी काही जणांनी भगवान बुद्धाचे नाव देखील ऐकले नसेल.
काही लोक म्हणतात की, हा नवीन देव कोठून आणला आहे. बुद्ध भगवंताचा हा धर्म या देशांमध्ये अत्यंत जुना आणि प्राचीन आहे. चीन, जापान, सयाम, इंग्लंड या बाहेरील देशातून हा धर्म येथे आणलेला नाही. या देवाला येथे कोणी आणले याबद्दलचा पहिला खुलासा असा करता येईल की, या देशातील पुरातन देवता आपल्याला ठिकठिकाणी सापडतात.
इतिहासाच्या काळामध्ये जी अनेक कारणे घडली त्यामुळे या धर्माचा लोप झाला.
बुद्ध धर्माला १९५६ साली अडीच हजार वर्षे पुरी होतील. हा धर्म साडेबाराशे वर्षे जिवंत होता; हे सिद्ध करण्यासाठी मी आज इतिहासातील पुरावा देणार आहे. पूर्वी या देशावर मुसलमानांच्या स्वा-या झाल्या. मुसलमान मूर्तिपूजक नसतात. त्यांनी बुद्ध धर्माच्या लोकांवर हल्ला चढविल्यामुळे हा धर्म खालावाला. अफगाणातील शंभर टक्के लोक बुद्ध धर्माचे होते. येथे बुद्ध धर्मात सात हजार भिक्षु होते. मुसलमानांनी त्यांच्यावर स्वा-या केल्या त्यावेळी त्या मुसलमानांपुढे दोनच प्रश्न होते. या देशातील लोकांनी मुसलमान धर्माचा स्वीकार करावा, हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न म्हणजे जो हा धर्म स्वीकारणार नाही त्यांची कत्तल करणे. त्यांनी या सात हजार भिंक्षुची कत्तल केली.
हा धर्म जिवंत होता तेव्हा तो फार प्रभावी होता. या देशात नालंदा विश्वविद्यालय होते. ज्ञानप्राप्ती करून देणे हे या धर्माचे तत्व होते. एक आचार्य व त्यांचे १० पोरे एकत्र बसत आणि ब्राम्हण शास्त्र शिकवित. अशी या धर्माची स्थिती नव्हती.
पहिले विश्वविद्यालय बौद्ध धर्मीय लोकांनी स्थापन केले. नालंदा विश्वविद्यालयात तेरा हजार विद्यार्थी व एक हजार अध्यापक होते. ब्राम्हण धर्म हा एकांगी होता. अन्य कारणांमुळे मुसलमानांच्या तडाख्यातून त्यांचा बचाव झाला. बौद्ध धर्माविरुद्ध ब्राम्हणांची कारस्थाने चालू होती. यामुळे तो खाली पडला.
तुमचा बौद्ध धर्म एवढा चांगला होता तर त्याचा ऱ्हास का झाला? असे माझे काही मित्र मला प्रश्न विचारतात. तेव्हा मी त्यांना असे विचारतो की, हा धर्म वाईट आहे म्हणून या धर्माचा ऱ्हास झाला असे म्हणावे तर चीन, जपान, कंबोडीया, सिलोन या देशांमध्ये या धर्माचा ऱ्हास का झाला नाही. तेथे अजून तो का टिकून आहे. या देशात हा धर्म नाहिसा झाला नाही तर त्याला निराळी वाळवी लागली असेल, कारस्थाने झाली असतील. सांगायचा मतलब असा की, त्याच्या निर्मितीपासून तो साडेबाराशे वर्षेपर्यंत यच्चयावत चालला होता. हा इतिहास इतिहासकारांनी लपवून ठेवला आहे. आपला महाराष्ट्र देशसुद्धा शंभर टक्के बौद्ध धर्मीय होता आणि त्याला पुरावा म्हणून महाराष्ट्रातील पुरातनकाळच्या कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येईल. भारतातील दोन हजार लेण्यांपैकी दीड हजार लेण्या महाराष्ट्रात आहेत. ही लेणी म्हणजे बौद्ध भिंक्षुची राहण्याची ठिकाणे होती. महाराष्ट्रात जी काही लेणी आहेत ती पांडवांची आहेत, असे सांगण्यात येते. परंतु विराटनगरी कोठे व पांडवांचे राज्य कोठे?
पंधरा हजार विहारातून सुमारे पस्तीस हजार भिक्षु राहत असत. जनतेकडून भिक्षा मागून ते आपली उपजीविका करीत. एक हजार दोनशे पन्नास वर्षे ते या प्रांतामध्ये होते. आपल्या वाडवडिलांपासून भगवंताची पूजा आपण करीत आलो आहो. हिंदू लोकांची धर्माची व्याख्या फार निराळी आहे. देवळात जाणे, घंटा वाजविणे, पूजा करणे आणि भटाला दोन पैसे देणे एवढेच या धर्माचे कार्य! जणू काही भटाच्या बापाचे ऋण फेडणे होय. परंतु हे काही आम्हाला जमले नाही विष्णूची पूजा करून विष्णू पावला नाही, शिवाच्या देवळात जाऊन शिव पावला नाही आणि मरीआई, म्हसोबा, खंडोबा तर पावलाच नाही. धर्माला नीतीचे बंधन हवे आहे. मनुष्याच्या पापी, दुराचारी वर्तनाला बंधन म्हणजेच धर्म!
कोणताही धर्म घेताना चोखाळून घेतला पाहिजे. धर्म म्हणजे बाजारपेठ आहे. ते विष्णूचे, ते शिवाचे, ते रामाचे दुकान आहे. तेथे पुजारी धुप, कापूर जाळत बसले आहेत. कृष्ण, राम, शिव, विष्णू यांचा धर्म हा असा धर्म आहे. धर्म मनुष्याचा उद्धार करतो. धर्म घात करण्याकरिता नसतो. आमची अवनती झाली असेल तर ती जातीभेदामुळे! जो धर्म जातीभेदाने बरबटलेला आहे, ज्या धर्मात असमानता आहे तो धर्म आम्ही कसा घेऊ? ज्या धर्मात समानता अधिष्ठित झाली आहे असा धर्म पाहिजे. बौद्ध धर्मात सर्वाना समान संधी व सर्वाना समान अधिकार दिलेला आहे. त्यात ऐक्यता आहे. भेदभाव नाही.
ह्या प्रसंगी आपणाला एका सुक्ताची आठवण करून द्यावीशी वाटते. ब्राम्हणाची पोरे होती, त्यांच्यामध्ये तत्वज्ञानाविषयी वाद चालू होता, 'ब्रम्ह हे घर आहे व आत्मा ब्रम्हाची छाया आहे.' ही सगळी पुराणातील वांगी आहेत. हा वाद मिटत नाही असे पाहून ती पोरे बुद्धाजवळ गेली. त्यांना ब्राम्हणांचे तत्वज्ञान पटलेले नव्हते. भगवंतानी त्यांना विचारले. हे ब्रम्ह सत्य आहे काय? तुम्ही ब्रम्ह पाहिले आहे काय? ते काही काळासाठी आहे की नित्य आहे! त्याचं रंगरूप कसं काय आहे? ते काही बोलते काय? त्याला चव आहे का सुगंध आहे? ते गुलाबाच्या फुलासारखे आहे की चाफ्याच्या? ते गोड आहे, तिखट आहे की आंबट आहे?
मनुष्यमात्राला सत्य कळण्याकरिता पाच इंद्रिये आहेत. डोळा, कान, नाक, जीभ वगैरे ती पाच इंद्रिये होत. डोळ्याने पाहता येते, कानाने ऐकायला येते नाकाने सुगंधित आहे की दुर्गंधित आहे असा वास कळतो. जिभेने खारट तिखट, आंबट चव कळते. पाच इंद्रियांची साक्ष ज्याला मिळते तेच सत्य. ब्रम्ह सत्य मानणे म्हणजे न पाहिलेल्या मुलीवर प्रेम करण्यासारखे आहे.
मला आपणाला दोन गोष्टी सांगावयाच्या आहेत. तुम्ही या धर्माचा स्वीकार कराल त्या दिवशी ब-याच गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. एकादशीला पंढरपूरला जाणे, द्वादशीला इतर क्षेत्राला जाणे बंद करायला हवेत. मला चांगली आठवण आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक येथे कुंड होते. या कुंडात फ़क्त पसाभर पाणी होते. यात्रेकरु लोक त्यात फड़के भिजवून घेऊन अंगाला चोळीत. अशा त-हेची खिचड़ी मी बौद्ध धर्मात होऊ देणार नाही. स्वच्छ पाण्यात घाणेरडे पाणी ओतता कामा नये. भगवान बुद्धाचा धर्म तोच आमचा धर्म, असा आता आम्ही निश्चय केला आहे. तुम्ही पंढरपुरला जाता, पांडुरंगाचे अभंग म्हणता. पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळातील लोकांची पंढरीचा विठ्ठल कोण होता यावर हुज्जत चालू आहे. पण माझा त्यांना खड़ा सवाल आहे की, विठ्ठलाची भानगड़ सोडून देऊन पंढरीचा पांडूरंग कोण? याचे पहिल्यांदा उत्तर द्या. तो होता कुठे? त्याला पळविलं कोणी? कोणी डुबविलं? पांडूरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी त्यांना सिद्ध करुन देईन. पुंडलीक या शब्दापासून पांडूरंग हा शब्द झाला. पुंडलीक याचा अर्थ कमळ. बौद्ध धर्मात मूर्तिपूजा नव्हती. अज्ञानी लोकांना तत्वज्ञान काय कळे! कमळाला पाली भाषेत पांडूरंग असे म्हणतात. तुम्हाला भुलविण्यासाठी ब्राम्हणांनी बुद्धाच्या नावाचा लोप केला. मतलबी लोक महाराष्ट्रातील लेणी ही पांडव लेणी असल्याचे सांगतात.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३