या लेखात डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्मातील वर्ण आणि जात व्यवस्थेवर अगदी समर्पक प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते हिंदू धर्मातील जातीव्यवस्था ही अनेक वर्गात विभाजित आहे. पहिला वर्ग त्या व्यवस्थेचा आहे ज्याला चातुर्वर्ण्य म्हणून संबोधिले जाते. चातुर्वण्य या प्राचीन व्यवस्थेमध्ये प्रथम तीन वर्ण ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य यांना एका वर्गात तर चौथा वर्ण शुद्र यांना दुस-या वर्गात ठेवून त्यांच्यात अंतर दाखविले गेला आहे. प्रथम तीन वर्णाला द्विज वर्ग मानले गेले आहे. परंतु शुद्राला द्विज वर्गातील मानण्यात आलेले नाही. विभाजित करण्याचा आधार हा ठेवला गेला आहे की प्रथम तीन वर्णाला यज्ञोपवित धारण करण्याचा आणि वेदांचे अध्ययन करण्याचा अधिकार आहे. शुद्राला हा अधिकार नाही. या विभाजनामुळे जातींचे दोन वर्गात विभाजन झाले आहे. याच विभाजनामुळे काही जातींना उच्च जाती आणि काही जातींना कनिष्ठ जाती म्हटल्या जाते.
या खाली सुद्धा एक वर्ग आहे जो वरील चार वर्णाच्या खाली आहे. हा वर्ग चार वर्ण अर्थात पहिल्या तीन अर्थात ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य या उच्च जाती आणि चतुर्थ वर्ण शुद्र अर्थात कनिष्ठ जातींच्या नंतरचा वर्ग आहे. हा वर्ग आपल्यापेक्षा वरच्या जातींना उच्च मानतो. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने तीन वर्णांना उच्च म्हटले आहे त्याचप्रमाणे या व्यवस्थेने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या बाहेर असलेल्या जातींचे सुद्धा विभाजन केले आहे. त्यांच्याजवळ त्यासाठी एक शब्द होता, जे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या आत आहेत भलेही त्या उच्च जाती किंवा कनिष्ठ जाती, ब्राम्हण असतील किंवा शुद्र, त्यांना सवर्ण म्हटले गेले म्हणजेच त्यांना वर्णाचा शिक्का बसला. जे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या बाहेर होते त्यांना अवर्ण म्हटले गेले म्हणजेच त्यांच्यावर वर्णाचा शिक्का लागलेला नव्हता.
हे अवर्ण हिंदू कोण आहेत, हिंदू समाजात त्यांचे काय स्थान आहे, सवर्ण हिंदूंसोबत त्यांचे संबंध कसे आहेत याकडे आतापर्यंत फारसे लक्ष कुणी दिलेले नाही.
अवर्ण हिंदूंचे तीन भाग आहेत. १) आदिम जाती २) गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती आणि ३) अस्पृश्य जाती.
सवर्ण जाती आणि अवर्ण जातीत असलेले विभाजन एकसारखे नाही. सवर्ण जाती आणि दोन अवर्ण जाती म्हणजेच आदिम जाती आणि गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती यांच्यात जसे संबंध आहे, त्यापेक्षा सवर्ण जाती आणि तीसरी अंतिम अवर्ण जाती म्हणजेच अस्पृश्य यांच्यासोबत असलेल्या संबंधापेक्षा वेगळे आहेत. सवर्ण जाती आणि प्रथम दोन अवर्ण जातीतील विभाजन जात-भाई म्हणजेच मित्रांसारखे आहेत. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण किंवा सम्मानजनक संपर्क संभव आहे. परंतु सवर्ण जाती आणि अस्पृश्य जाती यांच्यातील विभाजन विजातीय आणि विरोधी समुहातील विभाजन आहे. जिथे सम्मानजनक अटींच्या आधारावर मैत्रीपूर्ण संपर्काची कुठलीही संभावना नाही.
या विभाजनाचा आधार तसाच आहे जसा द्विज जाती आणि शुद्र जातीमधील आहे. सवर्णांमधील शुद्र जाती आणि अवर्णांमधील आदिम जाती आणि गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती यामधील अंतर अतिशय नगण्य आहे. हे अंतर स्पष्ट करण्यासाठी हिंदूंनी नविन शब्द निर्माण केले आहे. ते शूद्रांचे दोन वर्ण मानतात. १) सुसंस्कृत शुद्र आणि २) शुद्र. शूद्रांच्या प्राचीन वर्गाला त्यांनी सुसंस्कृत शुद्र आणि आदिम जातीसहित हिंदू सभ्यतेला मानलेल्या जातींना शुद्र हा शब्द वापरला. हे विभाजन केवळ यासाठी केले आहे की कोणते शुद्र द्विज जातीसोबत सहजीवन जगण्यास जास्त उपयुक्त आणि कोणते कमी उपयुक्त आहेत.
निश्चितच अवर्ण जातीतील या समुहात विभाजन आहे. आदिम जाती आणि गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती यांमध्ये विभाजन आहे किंवा नाही याबाबतीत शंका आहे. कदाचित हे अंतर अतिशय नगण्य आहे. परंतु यात कुठलीही शंका नाही की आदिम जाती व गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती आणि अस्पृश्य जाती यांच्यात स्पष्ट आणि मोठा वर्ग-भेद आहे. अवर्ण जातीतील प्रथम दोन जातींची स्पष्ट धारणा आहे की त्या उच्च जाती आहेत आणि अस्पृश्य जाती या कनिष्ठ जाती आहेत.
द्विज जाती आणि शुद्र जाती यामध्ये खरं तर विभाजन नाहीच. जे विभाजन आहे तो केवळ एक पडदा आहे. शुद्र जाती आणि प्रथम दोन अवर्ण जातीत विभाजन आहे परंतु ते सुद्धा अतिशय क्षीण आहे. हे विभाजन पार करता येऊ शकते. परंतु हे तीन वर्ग आणि अस्पृश्य यांच्यातील विभाजनच वास्तविक विभाजन आहे आणि याला दूर केले जाऊ शकत नाही. ते काटेरी कुंपणासारखे आहे आणि त्याचा स्पष्ट उद्देश दूर ठेवणे असा आहे. द्विज आणि शुद्र जातींमधील विभाजन दूर केल्या जाऊ शकते. म्हणजेच ते एकत्र येऊ शकतात. त्याचप्रमाणे दूसरे विभाजन सुद्धा दूर होऊ शकते. म्हणजेच द्विज, शुद्र, आदिम आणि गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती एक समूह बनवू शकतात आणि एकत्र राहु शकतात. परंतु तीसरे विभाजन कधीही दूर केले जाऊ शकत नाही. कारण जातींचे हे तीन वर्ग एका मुद्द्यावर सहमत आहेत की ते अस्पृश्यांसोबत एक होऊ शकत नाही. ही फार मोठी बाधा आहे जी अस्पृश्यांना बाकीच्यांपासून वेगळे करते आणि अलग-थलग राहण्यासाठी त्यांना विवश करते.
आदिम आणि गुन्हेगारी व्यवसाय करणा-या जाती कालांतराने हिंदू समाजाचे सदस्य बनू शकता. सध्या ते हिंदू समाजासोबत जुळलेले आहेत, नंतर ते हिंदू समाजाचे अंग बनू शकतात. परंतु अस्पृश्यांची स्थिति वेगळी।आहे. त्यांना अलग-थलगच राहावे लागेल, ते हिंदू समाजाचा अंग बनू शकत नाही. हिंदू आणि अस्पृश्य यांच्यातील संबंध कसे आहेत याची व्याख्या मुंबई मध्ये एका संमेलनात सनातनी हिंदूंचे नेते ऐनापुरे शास्त्री यांनी केली आहे. त्यांनी म्हटले की, हिंदू आणि अस्पृश्यांतील संबंध असे आहेत जसे मनुष्याचा त्याच्या पायातील जोड्यांशी असतो. मनुष्य जोड़े घालतात या दृष्टीने ते मनुष्यासोबत आहेत आणि असे म्हटले जाऊ शकते की ते मनुष्याचे आहेत. परंतु ते त्याच्या शरीराचे अंग नाही.