सवर्ण हिंदूंच्या हातात सत्ता राहिल्यास राखीव जागा भरतांना ते कसा अप्रामाणिकपणा करतात, याविषयी डॉ. आंबेडकर म्हणतात, "आम्ही वाईट कायदे असल्यामुळे, यातना भोगतो आहोत असे नव्हे तर वाईट शासनामुळे आम्हाला यातना भोगाव्या लागत आहेत. हे शासन केवळ हिंदू जातींच्या हाती असल्यामुळे वाईट झाले आहे. हे हिंदू, सामाजिक पूर्वग्रह शासनातही घेऊन जातात व अस्पृश्यांना मिळावयास हवा असणारा लाभ कोणते तरी कारण दाखवून ते त्यांना सतत मिळू देत नाहीत. जेथपर्यंत तुमचे शासन चांगले नाही तेथपर्यंत चांगले कायदे तुमचे काहीच कल्याण करु शकत नाही आणि अस्पृश्यांपैकी काही लोक सरकारी नोक-यांच्या पदावर जेव्हा जातील तेव्हाच तुम्हाला चांगले शासन मिळेल. कारण हे लोक, हिंदू अधिकारी अस्पृश्यांशी कशा त-हेने आचरण करीत आहेत यावर नजर ठेवून त्याला आळा घालतील व काही टवाळकी करण्यापासून त्यांना रोखतील. तथापि, केवळ राखीव जागांसाठी मागणी करणे पुरेसे नाही तर ह्या राखीव जागा ठराविक काळाच्या आत भरल्या जाव्या असा आग्रह धरणेही अत्यंत आवश्यक आहे. केवळ राखीव जागांपेक्षा याचे महत्त्व अतिशय आहे. कारण तुम्ही काळ निश्चित केल्याशिवाय राखीव जागा अस्तित्वात येणारच नाहीत. काही तरी कारणे दाखवून टाळाटाळ केल्या जाईल व अर्थातच नेहमीच्याच पण अतर्क्य कारणामुळे आपल्यामध्ये कोणी लायक उमेदवारच सापडणार नाही. आपणा सर्वांना माहीतच आहे की, नेमणूक करणारा अधिकारी जर एखादा हिंदू असेल तर अस्पृश्यांमध्ये कोणीही योग्य उमेदवार नसतोच!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.