बुधवार, २१ जुलै, २०२१

जो तो उठला सुटला पंढरी-पैठण-आळंदीला जातो

जो तो उठला सुटला पंढरी-पैठण-आळंदीला जातो. मला आपणास हे विचारावयाचे आहे की पंढरी-पैठण-आळंदीला जाऊन आपण काय मिळविले आहे? पंढरीला जाऊन कोणाचे भले झाले आहे काय? किंवा   आळंदीला जाऊन कोणाचा उद्धार झाला आहे काय? तुम्ही एकनाथाला फार मोठे मानता. त्याने काय केले? एक भागवत ग्रंथ लिहिला पण त्याची कथा मी आज तुम्हाला सांगतो. तो मेला त्यावेळी त्याची प्रेतयात्रा एका रस्त्याने जात होती. त्याच रस्त्याने एक सासुरवाशीण एक महार सोबतीला घेऊन सासरी जावयास निघाली होती. तिने ते एकनाथाचे मढे पाहिले. हा मला अपशकून झाला असे ती महारास बोलली. हे तिचे बोलणे एकनाथाच्या मढयाने ऐकले तेव्हा एकनाथ तिरडीवर उठून बसला आणि त्या सासुरवाशीणीस बोलला "मी आज मरत नाही. कारण तुला अपशकून होत आहे" असे म्हणून तो परत घरी गेला. नंतर पुढे एकनाथ व त्याची बायको यांनी नदीत जीव दिला. त्यांनी जीव का दिला याचा अद्याप शोध लागला नाही. आता तुम्हीच सांगा, कोणाचे तरी मढे जिवंत झाल्याचे तुम्ही ऐकले किंवा पाहिले आहे काय?

दुसरे ज्ञानेश्वराने तरी काय केले? त्याने भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे सार काय? तर जग हे ब्रम्हमय आहे. सर्व जगच जर ब्रम्ह आहे तर मग महार मांगातही ब्रम्ह असावयास पाहिजे. मग ज्ञानेश्वर महार मांगात का राहिला नाही? ब्राम्हणाने आपणास परत घ्यावे म्हणून त्याने प्रयत्न का केला? ब्राम्हणाने त्याला वाळीत टाकल्यानंतर त्याने त्यांना सांगावयास पाहिजे होते की, तुम्ही जरी मला जातीत घेतले नाही तरी हरकत नाही. मी महार-मांगात जाऊन राहीन कारण जग हे ब्रम्हमय आहे. असे ज्ञानेश्वराने का सांगितले नाही? ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी चातुर्वर्ण्याचे हिरीरीने समर्थन केले. सर्वसाधारण जनतेला भुलविण्यासाठी हे सर्व थोतांड रचलेले आहे आणि या थोतांडाला तुम्ही सर्व भुललेले आहात. आजचे युग हे विचाराचे युग आहे. कोणीही कसलेही थोतांड रचले तरी ते थोतांड आहे हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. कारण यापुढे तुम्हाला जगात वागताना विचार करुनच वागले पाहिले.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: